मायदेश पुर्वरंग

पुर्वरंग
शिवाजी महाराज आणि लोकमान्य यांच्या स्मरणाने आजही गदगद्णारे लोक आम्ही.मायदेशहून येणाऱ्या पत्रांची आणि वर्तमान पत्रांची वाट बघत इथली मराठी माणसे एकमेकांना धरून आहेत. मी ह्या परदेशच्या प्रवासात एकूण हेच पहात आलो. दूर देशी जावे, अफाट पैसा मिळवावा, त्या त्या देशांच्या संस्कृतीशी समरस व्हावे-- तिथले लोक निशागारात जातात म्हणून आपणही जावे, त्यांनी बॉलडान्स केला कि आपण करावा,त्यांच्या बायकांची वेषभूषा - केशभूषा आपण स्विकारावी, असली स्वत्व सोडायला लावणारी समरसता आपल्या मराठी मंडळींत बरीच कमी- मराही बायकांना मोकळेपणाने मद्यपान किंवा धूम्रपान करताना मी क्वचितच पाहिले आहे. साहेबाने आपला आपला क्रॉस जगभर नेला आणि कुठल्याही देशात तो राहिला तरी आपल्या घरात तो क्रॉस लावतो.ख्रिस्ताची तसबीर लावतो. तो फॉरवर्ड! आणि आम्ही आमच्या बजरंगाची किंवा गणरायाची तसबीर लावली तर ते बॅकवर्ड! हे केवळ गुलामीचे पाप.एखादी देवाची तसबीर. एखादे शिवाजी- राणाप्रतापाचे चित्र, एखादे मराठी पुस्तक मायदेशाशी आपले नाते ठेवते. परदेशात गेल्यावर आपल्या मायभूमीची नाळ अजिबात कापून टाकायला नको. परदेशची गोष्टच सोडा, पण इथे देखिल काही मराठी आया इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आपल्या मुलांचे इंग्रजीतून लाड करताना दिसतात तेव्हा मला संताप येतो. त्या घरी पुन्हा जाऊ नये असे वाटते. जगातल्या कुठल्याही इतर देशातल्या माता आपल्या लेकरांचे परक्यांच्या भाषेतून लाड करीत नाहीत. हे म्हणजे स्वतःचे स्तन्य असताना शेजारणीचे उसणे आणून पाजण्यासारखे आहे.