शिवचरित्रमाला - भाग १२९ - आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते

दिल्लीत औरंगजेब वैतागला होता शिवाजीनावाच्या दुखण्याला. इ. स. १६६० पासून त्याने महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या चालू ठेवल्या. मोगल राजपूत पठाण अरब ,रझाकी इराणी अन् असेच अनेक लढवय्ये सेनापती आणि सैनिक तो स्वराज्यावर पाठवीत होता. युद्धसाहित्य आणि पैसा अपरंपार ओतीत होता. मनुष्यबळाला तोटा नव्हता तरीही कोणालाही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध यश मिळत नव्हते. मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांचा अपवाद सोडला तर बाकी सगळे सेनानी नापास होत होते.

एक गोष्ट लक्षात येते की 
औरंगजेब स्वत: महाराजांविरुद्ध स्वराज्यावर कधीही चालून आला नाही. त्याच्या मनात सतत एक धास्ती होती की माझाच पराभव झाला तर काय होईल. म्हणून तो धोका पत्करत नव्हता. महाराज आग्ऱ्यात आणि आपल्या जबड्यात गवसले असतानाही पसार झाले. याचा त्याला अतिशय पश्चाताप होत होता. पश्चाताप होय पश्चाताप ,तो त्याने आपल्या स्वत:च्या तोंडाने पुढे अनेकदा बोलून दाखवला आहे. त्याच्या नोंदी त्याच्या स्वत:च्या डायरीत आहेत. तो सतत पुढे बोलून दाखवीत असे की , ' मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी भयंकर चूक केली. मी त्या शिवाजीला आग्ऱ्यात ताबडतोब ठार मारले नाही. 

इ.स. १६७० 
ते ७२ या तीन वर्षात मराठ्यांनी मोगलांना अक्षरश: हैराण केले. त्यावेळी दिलेरखान स्वत: मराठी मुलुखांवर आणि किल्ल्यांवर हल्ले चढवीत होता. पण जो अनुभव त्यालापुरंदर किल्ल्याशी झुंजताना आला तोच अनुभव सतत येत गेला. 

याच 
काळात दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हाकण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंत कडवा आणि हट्टी असा सरदार होता. 

कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर 
महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेमनव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता. एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळघेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. 

दिलेरची फौज खरोखरच मोठी 
होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते.पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला, ' मर्दांनो खानाशी झुंजायचंय जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो लढाल त्याला सोन्याची कडी पळाल त्याला चोळी बांगडी असे बोलूनरामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला.

साक्षात जणू 
भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच... वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्यपळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की ,मराठीयांची पोरे आम्ही भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला. 

कण्हेरा गडाला 
दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळमुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही त्याचं गाव माहीत नाही त्याचा ठाव माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे. 

आणि आम्हाला 
रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही आज. 

कदाचित पुढे मागे संशोधकांना या 
रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल. अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्याकाळजात प्रकाश टाकेल.